‘बाहुबली’ फेम प्रभासच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा त्याच्या लग्नाविषयी होताना पाहायला मिळते. ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभासला लग्नासाठी मागण्याही येऊ लागल्या. सहकलाकार अनुष्का शेट्टीसोबत तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. आता पुन्हा एकदा त्याच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण येण्याचे कारण म्हणजे त्याच्या काकांनी केलेले वक्तव्य.

प्रभासचे काका म्हणजेच तेलुगू इंडस्ट्रीचे लोकप्रिय अभिनेते कृष्णम राजू यांनी त्याच्या लग्नाविषयी नुकताच खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांना प्रभास कधी लग्न करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, ‘प्रभास याच वर्षी लग्न करतोय. त्याची स्वत:चीही यावर्षी लग्न करण्याची इच्छा आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले. प्रभासच्या काकांनी दिलेल्या या मुलाखतीची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

वाचा : आणखी एका चित्रपटाला ‘पद्मावत’चा धसका

‘बाहुबली’नंतर लग्नासाठी तब्बल ६००० मागण्या आल्याची माहिती प्रभासने याआधी एका मुलाखतीत दिली होती. मात्र, करिअरमुळे त्याने हे प्रस्ताव नाकारल्याचेही स्पष्ट केले होते. प्रभास आणि अनुष्का शेट्टी लग्न करणार अशा बातम्या दोघांनीही नाकारल्या आहेत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असे म्हणत त्यांनी लग्नाबाबतच्या सर्व बातम्या टाळण्याचा प्रयत्न केला.

प्रभासच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, सध्या तो ‘साहो’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.