अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. शनिवारी, १ डिसेंबर रोजी हे दोघे ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. तर रविवारी २ डिसेंबर रोजी पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यानंतर या जोडीने दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता. रिसेप्शन झाल्यानंतर पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निक-प्रियांकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. ही पोस्ट वाचल्यानंतर ड्रामा क्वीन राखी सावंतनेदेखील पंतप्रधान मोदींना तिच्या लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. बॉलिवूडमध्ये दीप-वीर आणि निक-प्रियांकाच्या लग्नाची चर्चा रंगत असताना राखीनेदेखील दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. तिच्या लग्नाविषयी तिने सोशल मीडियावर काही पोस्टही केल्या होत्या. त्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेचा विषयी ठरली होती. यामध्येच भर पडत आता तिने चक्क पंतप्रधान मोदींनी तिच्या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन त्यांनी निक-प्रियांकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांचं हे ट्विट पाहिल्यानंतर प्रियांकानेही त्यांना धन्यवाद दिल्याचं पाहायला मिळालं. 'आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मनापासून धन्यवाद. तुमच्या येण्यामुळे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि आम्हाला मनापासून आनंद झाला', असं म्हणतं प्रियांकाने पंतप्रधानांचे आभार मानले. या कमेंटमध्ये राखीनेदेखील एक कमेंट केल्याचं पाहायला मिळालं. View this post on Instagram Congratulations @priyankachopra and @nickjonas. Wishing you a happy married life. A post shared by Narendra Modi (@narendramodi) on Dec 5, 2018 at 1:15am PST 'व्वा, पंतप्रधान मोदीजी प्रियांका-निकच्या आनंदात तुम्ही सहभागी झालात ही फारच छान गोष्ट आहे. माझंदेखील लग्न ठरलं आहे. येत्या ३१ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता माझं लग्न होणार आहे, त्यामुळे प्लीज माझ्या लग्नात या आणि आम्हाला आशीर्वाद द्या', असं ट्विट करत राखीने पंतप्रधान मोदींना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान, राखीने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दीपक कलालसोबत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे या लग्नात ती सब्यासाचीने डिझाइन केलेला लेहंगाही परिधान करणार असल्याचंही तिने म्हटलं होतं. मात्र राखीने हे सारं पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी नाटकं रचलं आहे की ती प्रत्यक्षात खरंच लग्न करणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.