बॉलिवूडमध्ये रोज एखादे नाव चर्चेचा विषय ठरते. विषय काहीही असो, चर्चा तर होणारच असच काहीसं वातावरण या कलाविश्वात पाहायला मिळतं. सध्या अशाच चर्चा रंगत आहेत, बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत आणि निर्माता- दिग्दर्शक करण जोहर यांच्याविषयीच्या. कंगना आणि करणमध्ये गेल्या काही काळापासून घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन बरेच आरोप- प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. पण, त्यानंतर हे सर्व वाद मिटवत करण आणि कंगना या दोघांनीही एक नवी सुरुवात केली.

करण जोहर आणि रोहित शेट्टी परीक्षक पदी असलेल्या ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये कंगनाने नुकतीच हजेरी लावली. ती या कार्यक्रमात सहभागी होणार हे वृत्त समोर आल्यापासून त्याविषयीच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर कंगना या कार्यक्रमात आली आणि करणसोबतच्या तिच्या वादावर पडदा पडला असे म्हटले गेले खरे. पण, त्यांच्यातील वादाचा विस्तव अजूनही पूर्णपणे विझलेला नाही हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

कंगनाच्या विशेष उपस्थितीत या कार्यक्रमामध्ये गंमत म्हणून ‘तुम्ही एकमेकांना किती चांगले ओळखता?’ हा खेळ खेळण्यात आला. त्यावेळी करणच्या घरी गेल्यावर तो पाहुण्यांचा पाहुणचार कसा करतो, असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. त्याचे उत्तर देत ती म्हणाली, ‘विष देतो तो पाहुण्यांना. मला विचारा त्याच्याविषयी.’ ‘क्वीन’ कंगनाने मिश्किलपणे हसत दिलेल्या या उत्तरानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मुख्य म्हणजे त्यांच्यातील वाद खरोखर मिटला आहे ना, हाच प्रश्न पुन्हा एकदा त्यांच्या मनात घर करुन गेला.