नाना संघर्षांना तोंड देणारी आडगी संजू आता ‘फौजदारीण’ म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. तिच्यामुळे रणजीतची फौजदाराची नोकरी गेल्याने ढाले पाटलांच्या वाड्यात पुन्हा खाकी वर्दी घेऊन येण्याचा तिचा पण खरा ठरणार आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या लोकप्रिय मालिकेने महत्त्वाचे वळण घेतले आहे. रणजीतची नोकरी जाईल आणि संजीवनी खाकी वर्दीत येईल अशी कल्पनाही प्रेक्षकांनी केली नव्हती. पण हा सुखद धक्का लवकरच मिळणार आहे. अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याने रणजीतची फौजदाराची नोकरी जाते. परंतु काही महिन्यांपूर्वी रणजितने संजूकडून वचन घेतले होते की ढालेपाटलांच्या दारात पुन्हा एकदा लाल दिव्याची गाडी यावी. रणजीतचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संजूने घेतली. या प्रवासात संजूवर अनेक अडचणी आल्या आणि काही अडचणी राजश्रीने घडवून आणल्या, तर आईसाहेबांनीही पाठ फिरवली. तरीही जिद्द आणि निर्धार बाळगत तिने ध्येय गाठले. संजूला खाकी वर्दीत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत, शिवाय आता तिची भूमिका काय असेल, एरव्ही नम्रतेने वागणारी संजू आता कठोर भूमिका घेईल का?राजश्री आणि अपर्णाला धडा शिकवेल का?, हे पाहण्यात मजा येणार आहे. ‘या प्रवासात खूप नव्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. पहिली गोष्ट म्हणजे मी एका दिवसात बुलेट चालवायला शिकले. मनिराजने खूप मदत केली बाईक शिकायला. संजूने पोलीस होणे हे माझ्यासाठी म्हणजेच शिवानीसाठी खूप जास्त जवळचं आहे. मला खूप भारी संधी मिळाली आहे. कारण, माझे वडील पोलीस खात्यात काम करतात (बँक ऑफिस - सीनियर हेड क्लार्क). जेव्हा मी पहिल्यांदा वर्दी घालून त्यांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा काही सेकंद ते थबकले. त्यांना झालेला आनंद बघून मला भरून आलं. - शिवानी सोनार, (संजीवनी)