राधा प्रेम रंगी रंगली कलर्स मराठीवरील मालिकेत काही महिन्यांपासून राधा आणि प्रेमच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत होत्या. यामुळे काहीसे निराशेचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता बाप्पाच्या आगमनामुळे हे वातावरण काहीसे बदलण्याची शक्यता आहे. काही दिवसांसाठी का होईना मालिकेतही थोडे आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहेत. यंदा चाळीमध्ये ‘एक चाळ एक गणपती’ अशी कल्पना सगळ्यांनीच मान्य केल्यामुळे, चाळीमध्ये कोणाकडेच गणपती बसणार नाही. चाळीमधील गणपतीचे राधा आणि प्रेम, निंबाळकर परिवार आणि चाळीमधील इतर सदस्य मोठ्या थाटामध्ये स्वागत करणार आहेत.

यामध्येही बाप्पाची एक शाडूची मूर्ती जी विसर्जित केली जाणार आहे आणि दुसरी मोठी मूर्ती ही धातूची असणार आहे. म्हणजेच मालिकेमध्ये देखील पर्यावरणाचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे. तसेच प्रेम सगळ्या लहान मुलांना दहा हजार वह्या आणि पुस्तकांचं वाटप देखील करणार आहे. त्यामुळे गणपतीच्या सणानिमित्त मालिकेद्वारे एक चांगला सामजिक संदेश देखील देण्याचे काम करण्यात येणार आहे.

राधा आता तिच्या घरी सुखरूप पोहचली असून, देवयानीचा अचानक मृत्यू झाला आहे. दिपिका आता पूर्णत: एकटी पडली आहे. माधुरीला विक्रमने जे सत्य सांगितले आहे त्यामुळे माधुरीच्या मनात बरेच प्रश्न आहेत. प्रेम आणि लल्लन हे देवयानी आणि विक्रमची जुळी मुलं आहेत हे सत्य प्रेमच्या देखील समोर येते जे विक्रमच प्रेमला सांगतो. परंतु हे सगळे खरे नसून प्रेम आणि लल्लन विक्रमची नव्हे तर विश्वनाथ आणि देवयानीची मुलं आहेत. प्रेमला हे सत्य कधी कळेल ? हे सत्य कळल्यावर काय होईल ? हे बघणे रंजक असणार आहे. मात्र या सगळ्या गुंतागुंतीमध्ये राधा आणि प्रेमच्या आयुष्यात बाप्पा नक्कीच सुख घेऊन येईल यात शंका नाही. कारण, राधा आणि प्रेम आता गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करणार आहेत.