बिग बॉस १४ मध्ये फर्स्ट रनरअप ठरलेला राहुल वैद्यची लोकप्रियता गगनाला जाऊन भिडलीय. गायक राहूल वैद्य गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर राहत होता. पण बिग बॉस १४ मधून त्याला नवी ओळख मिळाली. यादरम्यान राहूल वैद्य आणि दिशा परमार या दोघांच्याही रिलेशनशीपबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या. गायक राहूल वैद्य सध्या साउथ आफ्रिकेच्या केपटाउनमध्ये खतरो के खिलाडी सीजन ११ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची तारीख लागोपाठ पुढे ढकलण्यात येतेय. करोना परिस्थितीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात येत असल्याचं सांगत राहूल वैद्यने अखेर दोघांच्या लग्नाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच राहूल वैद्य आणि दिशा परमार हे दोघेही त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करतील, असं चित्र दिसतंय.

नुकतंच गायक राहूल वैद्य याने एका माध्यमाला मुलाखत दिलीय. या मुलाखतीत त्याने दिशा परमारसोबत लग्नाचे काही प्लॅनिंग्स शेअर केले आहेत. केपटाउनमध्ये सुरू असलेल्या खतरो के खिलाडी सीजन ११ ची शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर तो दिशा परमारसोबत क्वालिटी टाईम घालवणार असल्याचं त्याने सांगितलं.

लवकरच लग्नाच्या तारखेची घोषणा करणार

या मुलाखतीत बोलताना राहूल वैद्य म्हणाला, “करोना परिस्थितीमुळे आम्हाला लग्नाची तारीख अनेक पुढे ढकलावी लागली. सध्याची परिस्थिती पाहता लग्नात केवळ २५ पाहूण्यांनाच आमंत्रित करू शकतो. पण आमच्या लग्नात सगळेच जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातलग उपस्थित रहावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही आशा करतो की लवकरच आम्ही लग्नाच्या तारखेची घोषणा करू.”

शो मधून परतल्यानंतर लग्नाच्या तारखेची घोषणा करणार

राहूल सध्या खतरो के खिलाडी सीजन ११ साठी केपटाउन मध्ये आहे. त्यामुळे दिशापासून दूर असल्यामुळे तो सध्या तिला खूप मिस करतोय. नुकतंच दिशाने सुद्धा त्याला मिस करत असल्याचं जाहीरपणे सांगितलं. राहूल लवकरात लवकर शूटिंग संपवून घरी परतण्याची दिशा वाट पाहतेय. दोघांची पर्सनल लाइफमधली केमिस्ट्री खूपच सुंदर आहे. सोबत या दोघांची ऑनस्क्रीन जोडी सुद्धा खूप रोमॅण्टिक दिसून आली. त्यामूळे खतरों के खिलाडीची शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर हे दोघेही लग्नाची तारीख जाहीर करतील, अशी आशेवर त्यांचे फॅन्स दिसून येत आहेत.