यन्ना रास्कला माइंड इट…. असं म्हणत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजविणारे अभिनेते म्हणजेच रजनीकांत. या अभिनेत्यासोबत एकदा तरी काम करायला मिळावं अशी प्रत्येक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्याची इच्छा असते. रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष यालाही आपल्या सासरेबुवांसाठी दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे.

धनुषने यावर्षी ‘पा पांडी’ या चित्रपटाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ज्येष्ठ अभिनेते राजकिरण यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या या चित्रपटाला समीक्षक, चाहते आणि सेलिब्रिटींकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’चं सध्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व असतानाही तामिळनाडूमध्ये धनुषच्या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली आहे. याच यशामुळे धनुषने आता या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये आपल्या सासरेबुवांना म्हणजेच रजनीकांत यांना त्याने मुख्य भूमिकेसाठी विचारल्याचीही चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुषच्या कामाने प्रभावित झालेल्या या ‘थलैवा’ अभिनेत्याने याआधीच चित्रपटासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

‘पा पांडी’ चित्रपटाची कथा एका वयोवृद्ध स्टंटमॅनवर आधारित असून, वयाच्या ६४व्या वर्षी कशाप्रकारे त्याला त्याचे प्रेम मिळते हे चित्रीत करण्यात आलेय. यामध्ये भावनिक कथा पाहायला मिळाल्याने सर्वांकडूनच चित्रपटाची प्रशंसा केली जातेय. अभिनेता मोहन बाबू याला मुख्य भूमिकेत घेऊन हा चित्रपट तेलुगुमध्येही येणार असल्याचे म्हटले जातेय. ‘कबाली’चे दिग्दर्शन करणाऱ्या पा. रणजीथ याच्या आगामी चित्रपटात रजनीकांत काम करणार असून त्याची निर्मिती धनुष करणार आहे. या चित्रटातील मुख्य अभिनेत्रीसाठी विद्या बालनचे नाव आघाडीवर आहे.