रक्षाबंधनच्या निमित्ताने सध्या कलाकारांनाही यासंबंधीचेच प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे नेमका आपला आवडता कलाकार हा सण कसा साजरा करतो हेसुद्धा चाहत्यांना कळत आहे. या सर्व वातावरणात किंग खाननेही त्याच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनविषयीचा खुलासा केला आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोलकात्याला गेलेल्या शाहरुखने त्याच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनवरुन पडदा उचलला.

याविषयी सांगताना शाहरुख म्हणाला, ‘मी दरवर्षी एका खास व्यक्तीच्या शुभेच्छांची वाट पाहात असतो. यंदाही मी त्यांच्या शुभेच्छांची वाट पाहीन. मी कोलकात्यात आलो आहे. पण, तरीही मी त्यांची भेट घेऊ शकलो नाहीये.’ आता शाहरुखच्या जवळची ही व्यक्ती आहे तरी कोण? असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला असतानाच किंग खानने याचं उत्तर दिलं. ज्यांच्या शुभेच्छांची तो आतुरतेने वाट पाहात असतो हाच ती व्यक्ती म्हणजे ममता बॅनर्जी. शाहरुख आणि ममता बॅनर्जी यांचं असं नातं अनेकांसाठीच अनपेक्षित होतं. पण, आता मात्र किंग खानला रक्षाबंधनच्या दिवशी बॅनर्जी शुभेच्छा देणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. किंग खान आणि पश्चिम बंगाल हे नातं तसा काही फार नवीन नाही. आयपीएलमध्येही ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाची मालकी असणारा शाहरुख तिथे बराच प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याचं आणि ममता बॅनर्जी यांचं वेगळंच नातं आहे असंही म्हटलं जातंय. शाहरुखही ममता बॅनर्जी यांना दीदी म्हणूनही संबोधतो.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

दरम्यान, बॉलिवूडचा किंग सध्या चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटामुळे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. अनुष्का शर्मा आणि शाहरुखच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या कमाईची बरीच संथ सुरुवात झाली असल्यामुळे येत्या काळात बॉक्स ऑफिसवर ‘हॅरी’ आणि ‘सेजल’ला प्रेक्षकांची पसंती मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.