अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन अत्यंत महत्वाचे आहे. संदिप आणि संदेश या दोन भावांच्या पाठची सोनाली लहानपणापासून दरवर्षी आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरा करण्याचा नियम पाळतेच.

सोनाली आपल्या भावांविषयी म्हणाली की, ‘माझे भाऊ माझे मेन्टॉर आहेत. माझं पहिलं पुस्तक ‘सो कुल’ मी त्यांना डेडीकेट केलं होतं. आणि आता दुसरं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा ते ही मी त्यांना डेडीकेट करणार आहे. ते दोघंही लहानपणापासूनच माझं अवघं विश्व आहेत.’
रक्षाबंधन साजरं करण्याबाबत ती म्हणते, ‘संदिप परदेशांत राहतो. त्यामुळे त्याची दर रक्षाबंधनाला भेट घडणं शक्य होत नाही. पण मी त्याला ई-मेल पाठवायचे. त्यावेळी लिहायचे की, तू तुझी मुलगी माहीला जेव्हा कडेवर घेशील तेव्हा माझी राखी तुला पोहोचली असे समजेन.’

वाचा : निर्मिती – कमलेशचे हे रेशमी बंध

संदेशसोबत रक्षाबंधन साजरं करण्याच्या आठवणी खूपच मजेशीर असल्याचं ती सांगते. ‘संदेश आणि मी रक्षाबंधनाला भेटतोच. यंदाही मी पुण्याला एका समाजसेवी उपक्रमात व्यस्त आहे. पण तो उपक्रम आटपून त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरं करायला मुंबईत परतणार आहे. मी चित्रपटसृष्टीत व्यस्त असल्यापासून रक्षाबंधन फारच धावत-पळत होतं. कधी माझ्या चित्रपटाच्या सेटवर, तर कधी विमानतळावर, एकवर्षी तर आम्ही दोघं खूप व्यस्त असल्याने कारमध्येच रक्षाबंधन साजर केलं होतं.

वाचा : अर्पिता- अलविराशिवाय सलमानला आहे आणखी एक बहिण

सोनालीचे दोघंही भाऊ खूप सुंदर गिफ्ट्स देतात, असं ती सांगते. त्याविषयी ती म्हणाली की ‘मला पुस्तक वाचायला खूप आवडतात. म्हणून संदेश दरवर्षी मला पुस्तकं देतो. त्याने दिलेली पुस्तक अनेकदा मला जगण्याचा नवा दृष्टीकोन देऊन जातात. मी लेखिकाही असल्याने, संदिप मला खूप सुंदर फाऊंटन पेन, नोटपॅड, फाइल्स अशी काही ना काही लेखनाशी निगडीत गिफ्ट्स देतो.’