मी परवानगी देत नाही तोपर्यंत रणबीर लग्न करणार नाही, या दीपिका पदुकोणच्या विधानामुळे आता नव्या चर्चांना ऊत येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी लग्नाचा निर्णय घेतल्याची चर्चा इंडस्ट्रीत होती. मात्र, दीपिकाच्या या नव्या विधानामुळे रणबीर-कतरिनाच्या नात्याविषयी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. साधारण वर्षभराच्या प्रेमसंबंधानंतर दीपिका आणि रणबीर कपूर यांचे नाते संपुष्टात आले होते. मात्र, दोघांमधील मैत्री अजूनही कायम आहे. या दोघांच्या बॉलीवूडमधील कारकीर्दीची सुरूवातही एकाच वर्षी आणि एकाच दिवशी झाली होती. याबद्दल बोलताना दोघांनीही आपल्याला जुने दिवस अजूनही स्मरणात असल्याचे म्हटले होते.

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या ‘तमाशा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने बराच वेळ एकत्र राहत आहेत. त्यांनी नुकताच एकत्रितपणे मुंबई ते दिल्ली असा ट्रेनमधून प्रवासही केला होता. या पार्श्वभूमीवर दीपिकाने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, रणबीर माझ्या परवानगीशिवाय लग्न करणार नसल्याचे म्हटले.

रणबीरने यापूर्वी कतरिनासोबत लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना हा माझ्या आयुष्यातील मोठा प्रश्न असल्याचे सांगितले होते. माझा विवाहसंस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे मी लग्न करेन तेव्हा सगळ्यांनाच त्याबद्दल सांगेन, असे रणबीरने म्हटले होते. मात्र, दीपिकाच्या या विधानानंतर रणबीर-कतरिनाच्या नात्याचे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘बचना ए हसिनो’, ‘ये जवानी है दिवानी’ या दोन चित्रपटानंतर ‘तमाशा’च्या निमित्ताने रणबीर-दीपिका तिसऱ्यांदा पडद्यावर एकत्रितपणे दिसणार आहेत.