सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. ‘संजू’च्या माध्यमातून रणबीरचंही जबरदस्त कमबॅक होणार आहे. म्हणूनच सध्या सोशल मीडियावर रणबीरचीच चर्चा आहे. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे रणबीरचं आलिया भट्टशी असलेलं नातं. मुलाखतींमध्येही हे दोघं आता रिलेशनशिपविषयी मोकळेपणाने बोलू लागले आहेत. ‘संजू’च्या निमित्ताने रणबीरने नुकतंच ट्विटरवर पदार्पण केलं आणि चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनीही आलिया आणि त्याच्या लग्नाबाबत अपेक्षित प्रश्न विचारला.

ट्विटर चॅटच्या माध्यमातून अनेकांनी रणबीरला प्रश्न विचारले आणि रणबीरने दिलखुलासपणे चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्याच्या आवडत्या गाण्यापासून ते लग्न कधी करणार इथपर्यंत बरेच प्रश्न युजर्सनी विचारले. लग्नाबाबतच्या प्रश्नावर ‘लवकरच.. ‘ असं उत्तर देत रणबीरने चाहत्यांना जणू इशाराच दिला आहे. आलियासोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा असतानाच आता या दोघांनी लवकरच लग्न करण्याचाही विचार केला का असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावू लागला आहे.

वाचा : इरफान खानने टेकले कॅन्सरपुढे हात

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर- आलिया एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये त्यांना एकत्र पाहिलं गेलं. तर एका मुलाखतीत ‘हे सर्व नवीनच आहे,’ असं सांगत रणबीरने प्रेमाची कबुली दिली. तर आलियानेही एका मुलाखतीत वयाची ३० वर्ष पूर्ण करण्याआधीच कदाचित मी लग्न करू शकते असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे आता बॉलिवूडच्या या नव्या कपलविषयी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.