प्रेमभंग झाले की माणसाला कशातच रस नसतो. आयुष्य कुठेतरी थांबलंय असंच वाटत असतं. मग त्यावेळी प्रेमभंगाची गाणी ऐकली जातात. या प्रेमभंगावर प्रत्येकाचे स्वतःचे असे विचार असतात. पण आता काळ बदलला तशी प्रेमभंगाची व्याख्याही बदलत चालली आहे. आता ब्रेकअप झाल्यानंतर प्रत्येकजण रडतच बसतं असं नाही तर ते ब्रेकअप वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेटही केलं जातं. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी सिनेमात तुम्हाला ब्रेकअपही एन्जॉय करायला लावणारं गाणं बघायला मिळणार आहे. या गाण्यातून तुटलेल्या हृदयाला आनंदी राहण्याचे एक कारण देण्यात आले आहे. ब्रेकअपवर अशाप्रकारचे गाणे याआधी कधीही झाले नाही. अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांनी या गाण्यात, कोणत्याही पश्चातापाशिवाय तुम्ही आनंदी कसे राहू शकता हे सांगण्यात आले आहे. हे गाणे रणबीर आणि अनुष्कावर चित्रित झाल्यामुळे ते नक्की मित्र आहेत की प्रेमी हेच कळत नाही. पण असं वाटत आहे की ते दोघंही प्रियकर आहेत पण चांगल्या मित्रांप्रमाणे ते प्रेमभंगही एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत.

या गाण्यात ‘जब वी मेट’ मधल्या गीतचा फण्डा वापरण्यात आला आहे. आपल्या पूर्व प्रेयसीचा फोटो जाळून टाक आणि तिला फोन करुन शिव्या दे असा सल्ला गीत म्हणजे करिना कपूर शाहिद कपूरला ‘जब वी मेट’मध्ये देते. याच ओळींचा वापर या गाण्याच्या रॅपमध्ये करण्यात आला आहे. या गाण्यात रणबीर अनुष्काला असं करण्याचा सल्ला देत आहे. जर यापुढे हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण या गाण्यातले बोल आणि संगीत हे तरुणाईच्या मनाला भिडणारे असेच आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’मधले हे गाणे इतर गाण्यांपेक्षा वेगळे आहे. या गाण्यात तरुणाई ब्रेकअपही एन्जॉय करताना दिसत आहे. प्रत्येकाला हे गाणे नाचायला आणि गुणगुणायला भाग पाडणारे आहे. या गाण्यामुळे कोणालाही आपल्या पूर्व प्रियकर आणि प्रेयसीला विसरायला नक्कीच मदत होईल. अरिजीत सिंग याने हे गाणे गायले आहे. तर बादशाहने या गाण्यात रॅप देऊन या गाण्याला अजून जीवंत केले आहे.