स्पेनच्या सुट्टीतील कतरिना आणि रणबीरच्या छायाचित्रांवरून जे वादाचे मोहोळ उठले होते त्यापासून रणबीर लांब राहिला होता. त्याचे कारण रणबीरने आता स्पष्ट केले आहे. अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी श्रीलंकेत गेलेला रणबीर आता मुंबईत परतला असून पहिल्यांदाच या प्रकरणावर जाहीरपणे बोलला आहे. कतरिनाची आणि माझी छायाचित्रे कोणत्याही प्रसिद्धीसाठी नाहीत, असे स्पष्ट करत असतानाच त्याने कतरिनाबद्दल काळजीही व्यक्त केली आहे.
‘प्रत्येक गोष्टीबद्दल बोलण्याची एक योग्य वेळ असते. हे सगळे झाले तेव्हा मी श्रीलंकेत होतो. माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर केंद्रित झाले असल्याने आजूबाजूला काय चालले आहे याकडे मी अजिबात लक्ष दिले नव्हते. पण, आता मी इथे परत आल्यानंतर मात्र बोलणे आवश्यक होते. माझ्या आयुष्यात माझे कुटुंब, नातेवाईक यांच्याबरोबरच अयान आणि कतरिना यांचे खास महत्त्व आहे. कतरिनाला माझ्या आयुष्यात खरोखरच महत्त्वाचे स्थान आहे’, अशी कबुलीही त्याने दिली आहे.
रणबीर सध्या मुंबईत ‘बेशरम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला असल्यामुळे या चित्रपटासाठीच त्याने छायाचित्रे प्रसिद्ध केली असल्याचेही बोलले जात होते. मात्र, ‘बेशरम’ काय कुठल्याच प्रसिद्धीसाठी आपण तसे केले नसल्याचे रणबीरचे म्हणणे आहे. आपल्याच छायाचित्रांचा कोणी प्रसिद्धीसाठी कसा वापर करेल?, असा उलटा प्रश्न करत आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बऱ्याच घडामोडी होत आहेत. पण त्याची अशा प्रकारे प्रसिद्धी होत असल्याबद्दल रणबीरने खंत व्यक्त केली आहे.