बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर परिवार १९५१ मधील प्रसिद्ध चित्रपट ‘आवारा’ची पुनर्निर्मिती करणार असल्याच्या वृत्ताचे रणबीरने खंडण केले. कोलकात्यात वार्ताहारांशी बोलताना रणबीर म्हणाला, मला हे माहिती आहे की अशा उत्कृष्ठ चित्रपटाची पुनर्निर्मिती अशक्य आहे. एकदा जेव्हा असा चित्रपट तयार होतो, तेव्हा यासारख्या चित्रपटाची पुनर्निर्मिती करणे अशक्य असते. असा चित्रपट बनविण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही. हे मी जाणतो.
‘आवारा’ चित्रपटाच्या पुनर्निर्मितीच्या आणि रणबीरने या चित्रपटात अभिनय करण्याच्या बातम्या वडील ऋषी कपूर यांचा हवाला देत माध्यामात येत असल्याबाबत विचारले असता तो म्हणाला, मी पण हे वर्तमानपत्रातूनच वाचले आहे. पृथ्वीराज कपूर, राजकपूर आणि नर्गिस यांचा अभिनय असलेल्या ‘आवारा’ या चित्रपटाला टाइम मासिकातर्फे १९२३ नंतरच्या १०० उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये स्थान दिले गेले आहे. याशिवाय दीपिका पदुकोणबरोबर ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटात काम करत असलेल्या रणबीरने सांगितले की मला ऍक्शन चित्रपट करण्याची इच्छा आहे. परंतु, त्यासाठीची आवश्यक असलेली शरीरयष्टी माझ्याकडे नाही. माझ्याकडे सिक्स पॅक अॅब्स नाहीत, जे ऍक्शन चित्रपटांसाठी आवश्यक असतात.