बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्न झाल्यानंतर मुंबईत परतली आहे. ३ मे रोजी राणी मुंबई विमानतळावर दिसली. तिने २१ एप्रिलला चित्रपट निर्माता आदित्य चोप्राशी इटलीमध्ये खासगी पद्धतीने विवाह केला होता.
राणी मुखर्जीने यावेळी जिन्स, निळे टीशर्ट आणि लाल रंगाचे जॅकेट घातले होते. राणीने दिलेल्या माहितीनुसार माध्यमांच्या घे-यापासून वाचण्यासाठी आदित्य आपल्या परिवारासोबत गुपचूप दुस-या फ्लाइटने मुंबईला आला. मुंबईत परतलेल्या या नव दाम्पत्याने रविवारी निकटवर्तीय आणि मित्रमैत्रीणींसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता अनुपम खेर, किरण खेर, वैभवी मर्चण्ट आणि अन्य काही सेलिब्रेटी उपस्थित होते. मात्र, या नव जोडप्याच्या एकत्र छायाचित्राची अजून एकही झलक मिळालेली नाही. खरं तर, कॅमे-यापासून वाचण्यासाठी यश चोप्रांच्या बंगल्याभोवती सुरक्षा वाढविण्यात आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंगल्याभोवती एक उंच भिंत असून त्यास पांढ-या रंगाच्या पडद्याने झाकण्यात आले आहे. जेणेकरून, त्यांच्या घरात चाललेली कोणतीही हालचाल कॅमेरात कैद होणार नाही.