लग्नापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकले होते. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. ९० सेकंदांच्या या जाहिरातीची पार्श्वभूमी लग्नसमारंभाचीच होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये इटलीत या दोघांनी लग्नगाठ बांधली. आता याच प्रतिष्ठित ब्रँडने विरुष्काच्या जागी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगला जाहिरातीसाठी विचारणा केली आहे. विशेष म्हणजे रणवीर- दीपिकाच्या लग्नाचीही सध्या जोरदार चर्चा आहे.

दोघांनी अद्यापही आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलणं टाळलं असलं, तरीही येत्या नोव्हेंबरमध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘मान्यवर’ने आपल्या जाहिरातीसाठी या दोघांना संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. मात्र रणवीर-दीपिकाने अद्याप आपलं उत्तर कळवलेलं नाही.

वाचा : लग्नाबाबतच्या प्रश्नावर रणबीरचं सूचक वक्तव्य

काही दिवसांपूर्वी वांद्रे इथं दीपिका आईसोबत दागिन्यांची खरेदी करताना दिसली होती. त्यामुळे ही लग्नाची खरेदी असल्याच्या चर्चादेखील बी- टाऊनमध्ये रंगल्या. गेल्या पाच वर्षापासून रणवीर आणि दिपिका एकमेकांना डेट करत आहेत. तेव्हा आता बी- टाऊनच्या या ‘बाजीराव मस्तानी’च्या नात्याला नेमकं कोणतं वळण मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.