छोट्या पडद्यावरील ‘उतरन’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे रश्मी देसाई आणि नंदीश संधू. प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेल्या या जोडीने २०१२ मध्ये लग्न केले होते. मात्र, थोड्याच दिवसांत दोघांमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. ज्यामुळे या दोघांनी २०१५ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या असून दोघंही त्यांच्या आयुष्यात पुढील वाटचालीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे नंदीशसोबत विभक्त झाल्यानंतर रश्मी एका टीव्ही अभिनेत्याला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.

‘बढो बहू’ या मालिकेतील अभिनेता अरहान खान याला रश्मी डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. अरहानने ‘बढो बहू’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली असून मालिकांव्यतिरिक्त त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

२०१७ मध्ये युविका आणि प्रिंस नरूला यांच्या लग्नामध्ये रश्मी आणि अरहानची भेट झाली होती. त्यानंतर या भेटीचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र हे दोघही याविषयावर बोलणं टाळत असून ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगत आहेत.

दरम्यान, नंदीशसोबत घटस्फोट घेण्यामागे त्याचा मुलींसोबतच असलेला मोकळाढाकळा स्वभाव कारणीभूत असल्याचं रश्मीने सांगितलं होतं. तर रश्मी गरजेचेपेक्षा जास्त संवेदनशील असल्यामुळे ती डोकेदुखी ठरत असल्याचं नंदीशने सांगितलं होतं. त्यामुळेच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. “आम्ही दोघांनी हे नाते वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये आम्ही असफल ठरलो. जर एकमेकांबरोबर राहण्यात सुख वाटत नसेल तर वेगळे होण्यातच शहाणपण आहे, त्यामुळे आम्ही घटस्फोटाचा घेतला”, असं रश्मीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.