छोट्या पडद्यावरील रश्मी देसाई आणि नंदीश संधू ही लोकप्रिय जोडी एकमेकांपासून विभक्त होणार आहे. घटस्फोट घेण्याविषयी दोघांचेही एकमत झाले असून लवकरच ते एकमेकांपासून वेगळे होतील. गेल्या वर्षभरापासून रश्मी देसाई आणि नंदीश संधू हे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगली होती. अखेर स्वत: रश्मीने या बातमीला दुजोरा देताना, हो, ही गोष्ट खरी आहे, आम्ही घटस्फोट घेत आहोत, असे ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
टेलिव्हिजनवरील ‘उतरन’ या मालिकेमुळे रश्मी आणि नंदीशची जोडी लोकप्रिय झाली होती, त्यानंतर २०१२मध्ये या दोघांनी लग्न केले होते. मात्र, थोड्याच दिवसांत दोघांमध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. नंदीशचा मुलींच्याबाबतीतला मोकळाढाकळा स्वभाव रश्मीसाठी चिंतेचे कारण ठरत होता, तर रश्मीचा गरजेपेक्षा संवेदनशीलपणा नंदीशसाठी डोकेदुखी ठरत होता. काही दिवसांपूर्वी एका मुलीबरोबरचे नंदीशचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर रश्मी आणि नंदीशमधला दुरावा आणखीनच वाढला होता. या सगळ्या प्रकारानंतर मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये रश्मीने तिच्या आणि नंदीशच्या घटस्फोटाविषयी सांगितले होते. आम्ही दोघांनी हे नाते वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये आम्ही असफल ठरलो. जर एकमेकांबरोबर राहण्यात सुख वाटत नसेल तर वेगळे होण्यातच शहाणपण आहे, त्यामुळे आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे रश्मीने सांगितले.

rashmi-nandish-5
काही दिवसांपूर्वी एका मुलीबरोबरचे नंदीशचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर रश्मी आणि नंदीशमधला दुरावा आणखीनच वाढला होता.