प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही पोस्टमुळे नव्हे तर अभिनेता नंदीश संधूसोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. रश्मीने ‘उतरन’ या मालिकेतील सहकलाकार नंदीशसोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं नातं दिर्घ काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर तीन वर्षातच रश्मीने नंदीशला घटस्फोट दिला.

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं. तिने या घटस्फोटासाठी नंदीशच्या वर्तनाला जबाबदार धरलं आहे. ती म्हणाली, “नंदीश हा अत्यंत विचित्र प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो वरकरणी खूप शांत आणि सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती वाटतो. पण तो माझा गैरसमज होता. आमच्या नात्यात समानतेचा दर्जा नव्हता. तो अनेकदा मला अपमानास्पद वागणूक द्यायचा. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण हे नातं टिकू शकलं नाही. अखेर सातत्याने होणाऱ्या मतभेदांना वैतागून मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटामुळे मी काही काळ नैराश्येत देखील होते.”

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

रश्मी देसाई ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २००६ साली ‘रावण’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘परी हू मै’, ‘हंटेड नाईट्स’, ‘अधुरी कहानी हमारी’, ‘दिल से दिल तक’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. ‘उतरण’ या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. शिवाय ‘बिग बॉस’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखलाजा’, ‘कॉमेडी नाईट्स’ यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोंमध्येही ती झळकली आहे.