गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले.’ झी मराठी वाहिनीवरील या मालिकेच्या दोन्ही भागांनी, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘रात्रीस खेळ चाले २’ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते. आता या मालिकेचा पुढचा भाग 'रात्रीस खेळ चाले ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रोमो प्रदर्शित झाला आहे. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी "अण्णा नाईक.. परत येणार!!! 'रात्रीस खेळ चाले ३' लवकरच.." असे कॅप्शन दिले आहे. View this post on Instagram A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये २० वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले ३’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.