झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून कुटुंब आणि भाऊबंदकीचे कथानक मांडले जात असून अंधश्रद्धा पसरवली जात नाहीये असे मालिकेचे निर्माते सुनील भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या मालिकेच्या पहिल्या भागावर अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा आरोप होता. त्याचा दुसरा भाग नुकताच झी मराठीवर सुरू झाला आहे. 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पूर्ण पाहिल्यानंतरच टीका करणे योग्य ठरेल. मालिका न पाहता शंकांचे समाधान झाले नाही तर निश्चितपणे टीका होऊ शकते. त्यामुळे मालिका प्रथम पहा असे आवाहन निर्माते सुनील भोसले यांनी या परिषदेत केले. तर या मालिकेशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मतभेद असू शकतात. पण प्रेक्षकांनी त्रयस्थपणा दाखवला तरच मालिकेचा आनंद घेता येईल, असं सहनिर्माते म्हणाले. घरातील भाऊबंदकी, कौटुंबिक संबंध आणि त्याचे आई- मुलांवर होणारे परिणाम हे या मालिकेत दाखविले जात आहेत. पहिल्या भागाचे उत्तर दुसऱ्या पर्वात दिले जात आहे. त्यामुळे कथेत वेगळेपणा दिसेल असे निर्माते सुनील भोसले म्हणाले. 'या मालिकेतून अंधश्रद्धा पसरविली जात नाही किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. हे तुम्हाला मालिका पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. कोकणातील रुढी, परंपरा, सण, उत्सव यात दाखविले जात आहेत,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. या मालिकेच्या पहिल्या पर्वाने दोनशे भाग पूर्ण केले होते. आता दुसरे पर्व कथानकानुसार संपेल असंही निर्मात्यांनी सांगितलं.