अभिनेत्री रवीना टंडनने 90 च्या दशकात तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांवर भुरळ घातली होती. 90 च्या दशकातील बोल्ड आणि ग्लमरस अभिनेत्री अशी ओळख असलेल्या रवीनाने अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलंय. रवीना सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. नुकतच रवीनाने एका मुलाखतीत बॉलिवू़डमध्ये देखील अनेक निगेटिव्ह लोक असल्याचं म्हंटलं आहे. हे लोक आता निर्माते झाले असून अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवतात असंही ती म्हणालीय. याचवेळी तिने सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्यांबद्दल तिचं मत मांडलंय.

एका मुलाखतीत रवीना म्हणाली, ” सोशल मीडियामुळे अनेकापर्यंत पोहचता आलं, लोकप्रियता मिळाली. मला वाटतं हे एक वरदान आहे. मात्र बऱ्याचदा ट्रोल आणि निगेटिव्हीटीमुळे तो एक अडथळा वाटू लागतो. आम्हाला अनेकदा अशांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही बऱ्याच लोकांमध्ये इतकी नकारात्मकता भरली आहे जे आता निर्माते झाले आहेत आणि अनेक कलाकारांना आपल्या तालावर नाचवत आहेत. असे लोक आजही आसपास आहेत मात्र मी त्यांच्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करते.”

पुढे सोशल मीडियावरील ट्रोल करणाऱ्यावर बोलताना ती म्हणाली, ” मी ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मी त्यांना माझ्या आयुष्यातून बाजूला काढून टाकलंय आणि हेच उत्तम आहे असं मला वाटतं. माझ्या मते आपण कायम सकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत राहणं गरजेचं आहे. जे तुमच्यासाठी चांगले आहेत आणि स्वत:साठी देखील.”

महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वीच रवीनाने तिची सर्व कामं उरकली आहेत. शिवाय एका पुरस्कार सोहळ्यासाठी गोव्याला जाणंदेखईल तिने टाळलं. ती म्हणाली सध्या आपण आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांसाठी मदत करणं गरजेचं आहे. रवीना ‘केजीएफ-2’ या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता यश याच्यासोबत महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.