पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला. राजकारण्यांपासून क्रीडा, मनोरंजन विश्वातील अनेकांनी सोशल मीडियावर या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. काहींनी अल्पावधीतच शहिदांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक निधीही जमवला आहे. सर्व स्तरावरून मदतीचे हात पुढे येत असताना अभिनेत्री रवीना टंडन हिनं देखील मदत कार्यात खारीचा वाटा उचलला आहे.

रवीनानं पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलींचा शिक्षण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शहिदांच्या कुटुंबाकरिता मदतनिधी गोळा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नवी दिल्लीतील रोटरी क्लबच्या कार्यक्रमात रवीनानं आपला निर्णय जाहीर केला आहे. विविध समाजकल्याण कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या रवीनाच्या निर्णयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे.

‘मदत लहान मोठी नसते . देशासाठी प्राण गमावलेल्या शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढे आलंच पाहिजे’ असं म्हणत रवीनानं मदतीचं आवाहन केलं आहे. रवीनासोबतच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनी देखील शहिदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. याआधी ‘उरी’, ‘टोटल धमाल’ चित्रपटाची टीम, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार , समलान खान यांनी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक निधी जमा केला होता.