बॉलिवूड वर्तुळात वरवर बराच झगमगाट आणि कलाकारांमध्ये जीवाभावाची मैत्री दिसत असली तरही खरे चित्र काही वेगळेच असते. हृतिक आणि कंगना किंवा इतर काही सेलिब्रिटींमध्ये असणारे वाद पाहता याचा अंदाज लावता येणे सहज शक्य होते. कलाकारांमध्ये असणारे मतभेद हा आताच प्रकाशझोतात आलेला मुद्दा नसून ९० च्या दशकातही काही प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये वादाची ठिणगी आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्र चालल्याचे पाहायला मिळाले होते.

अजय देवगण, रवीना टंडन या दोघांमध्ये त्यावेळी वादाची ठिणगी उडाल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे तर अजय आणि रवीना त्यावेळी एकमेकांना डेट करत असल्याचेही म्हटले जात होते. अभिनेत्री करिष्मा कपूरसोबतही त्याचे नाव जोडले गेले होते. पण, रवीना आणि त्याच्या नात्याविषयी नकारात्मक गोष्टीच जास्त चर्चेत होत्या. १९९४ मध्ये एका मुलाखतीत अजयने रवीनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तर अनेकांच्याच भुवया उंचावल्या. एका प्रसिद्ध मासिकाशी बोलताना अजय म्हणाला होता, ‘तिच्याविषयीची काही माहिती मी जर सर्वांसमोर उघड केली तर, ती कोणासमोर तोंड दाखवण्यालायकही राहणार नाही.’ अजय आणि रवीना रिलेशनशिपमध्ये असतेवेळीच करिष्माकडे त्याची ओढ जास्त वाढू लागली. ज्यामुळे शेवटी रवीनासोबतच्या त्याच्या नात्यात दुरावा आला.

बऱ्याच वादांनतर ते दुरावले खरे पण, त्यानंतरच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये याविषयीचा भडका पाहायला मिळाला. माध्यमांशी संवाद साधताना प्रत्येक मुलाखतीत त्या दोघांनीही एकमेकांविषयी वाईट बोलण्यास सुरुवात केली. एका मुलाखतीत तर, त्याने रवीनाला जन्मत:च खोटेपणाने वागण्याची सवय असल्याचे स्पष्ट केले.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

‘तिने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी नाहीतर काही दिवसांनी तिला वेड लागेल. हवंतर मी तिला डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत साथ देतो’, असे तो एका मुलाखतीत म्हणाला होता. रवीनाशी आपले कधीच कोणत्याही प्रकारचे नाते नव्हते असेच अजय नेहमी म्हणत होता. त्याच मुलाखतीत ज्यावेळी त्याला रवीनासाठी लिहिलेल्या प्रेमपत्रांविषयी विचारण्यात आले होते, तेव्हा कोणती प्रेमपत्र? असा प्रतिप्रश्न करत त्याने सर्वांनाच थक्क केले होते. ‘त्या मुलीला सांगा की तिने पुढे येऊन ती पत्र माध्यमांसमोर आणावीत. तिच्या कल्पनाशक्तीचे उदाहरण मलाही पाहायचे आहे. फक्त प्रकाशझोतात येण्यासाठीच ती स्वत:चे नाव माझ्यासोबत जोडतेय’, असे अजय म्हणाला होता. अजय देवगण सध्या बॉलिवूडमध्ये ‘फॅमिली मॅन’ म्हणून ओळखला जात असला तरीही त्याच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा एकेकाळी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या हे मात्र नाकारता येणार नाही.