मराठीतील सुपरस्टार म्हणून लौकिक मिळवणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे कधी गिरगावच्या आपल्या जुन्या आठवणीत हरखून गेला की एक गोष्ट आवर्जून सांगायचा की, ‘अरे मी तसा फारसा कोणीही नव्हतो तेव्हा विसर्जन मिरवणुकीचा मी भरपूर आनंद घ्यायचो. प्रार्थना समाज ते ऑपेरा हाऊस असा एका मिरवणुकीत नाचत नाचत गेलो की पुन्हा मागे यायचो व पुन्हा प्रार्थना समाजपासून नाचायला सुरुवात करायचो. शक्यतो कच्चीबाजा चांगलाच असण्याकडे माझा कल असायचा. अगदी बेभान होऊन नाचायचो.. ते दिवस मी कधीच विसरणार नाही’. लक्ष्या खूपच भावूक होत त्याचा अनुभव सांगायचा. लक्ष्मीकांत गिरगावात कुंभारवाडय़ात लहानाचा मोठा होतानाचा हा त्याचा अनुभव होता. गणेशोत्सव म्हटला की हिंदी-मराठीतील ठरावीक कलाकारांच्या घरचे गणपती, आरके स्टुडिओतील गणपतीची परंपरा या सगळ्या गोष्टींची आठवण हटकून होतेच. मात्र असे कलाकार-दिग्दर्शकांचे काही व्यक्तिगत तर काही चित्रपटांनिमित्ताने ऐकायला मिळालेले किस्सेही भरपूर आहेत. चित्रपटसृष्टी व श्रीगणेशोत्सव यांचे नाते विविध स्तरावरचे. नाना पाटेकरपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेकांच्या घरी गणपती येतो. ‘हमसे बढकर कौन’, ‘दर्द का रिश्ता’, ‘अग्निपथ’ अशा हिंदी चित्रपटातील गणपती गीतं, मराठीतील ‘अष्टविनायक’सारखा चित्रपट. तसेच लहान मोठय़ा कितीतरी चित्रपट स्टुडिओतील श्रीगणेशोत्सवाचे असे बरेच संदर्भ आहेत. पण त्याशिवाय देखील हा उत्सव व उत्साह चित्रपटसृष्टीत टिकून आहे. अभिनेता राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझने अनेकांना असे काही झपाटून टाकले होते की त्या काळात कामाठीपुरा विभागात एका ठिकाणी चक्क राजेश खन्नाच्या रूपातील श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना झाली होती आणि तेव्हाची ती चक्क चौकटीची बातमी झाली होती. ‘जंपिंग जॅक’ जीतेंद्र मूळचा गिरगावातील ‘रामचंद्र बिल्डिंग’चा रहिवाशी. स्टार झाल्यावर तो पाली हिलवर ‘निभाना’ इमारतीत आणि मग जुहूला आपल्या ‘कृष्ण’ बंगल्यात राहायला गेला. पण आयुष्याच्या या दीर्घ प्रवासात तो गिरगावला अजिबात विसरला नाही. आजही तो गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या जुन्या इमारतीतील गणपती पूजेला येतोच. आता त्याचे नाव ‘सुंदर भवन’ झालेय इतकाच काय तो बदल. पण ना जीतेंद्रची त्या गणपतीविषयीची आपुलकी बदलली ना या इमारतीतील लोकांचा उत्साह कमी झाला आहे. ‘अमर, अकबर, अँथनी’, ‘मर्द’, ‘कुली’सारख्या मसाला चित्रपटांचे बादशाह दिग्दर्शक मनमोहन देसाई हेसुद्धा गिरगावातील खेतवाडीचे रहिवाशी. तेही सार्वजनिक श्रीगणेशोसत्वात आनंदाने सहभागी होत असत. अभिनेता अशोक सराफ तर श्रीगणेश भक्त. फार पूर्वी तो एका अपघातात सापडल्याने बराच काळ चित्रपटसृष्टीबाहेर होता. पूर्ण बरा झाल्यावर त्याने अनंत चतुर्थीचा मुहूर्त पाहूनच पुन्हा कामाला सुरुवात केली होती. रमेश साळगावकर दिग्दर्शित ‘मामला पोरीचा’ हा तो चित्रपट होता. नाना पाटेकर व मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिकेने गाजलेल्या ‘अग्निसाक्षी’ चित्रपटाचा मुहूर्त १९९४ च्या श्रीगणेश चतुर्थीच्याच दिवशी दुपारीच झाला ही खास आठवण सांगायलाच हवी. अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमधील या मुहूर्ताला नाना पाटेकरला घरी निघण्याची घाई असणे स्वाभाविक होतेच. कारण माहीमच्या आपल्या घरच्या गणपतीची पूजा त्याला करायची होती. तोपर्यंत चित्रपटासाठी मनीषाची निवड झाली नव्हतीच मग दिग्दर्शक पार्थो घोषने नाना व जॅकी श्रॉफवर एका छोटय़ाशाच दृश्याचे आयोजन केले होते. निर्माता बिंदा ठाकरे विशेष खुशीत होताच. अर्थात आपल्या पुत्राच्या चित्रपटाचा मुहूर्त असल्याने बाळासाहेब गप्पांत छानच रमले. पण नानाची घरी जायची चुळबुळ लपत नव्हतीच. मुहूर्त दृश्य होताच सगळेच निघाले तेवढय़ात धर्मेद्रचे आगमन झाले आणि नानाला आणखी काही काळ थांबावे लागले. तर १९९५ च्या अनंत चतुर्थीच्या दिवशीच रामगोपाल वर्मा दिग्दर्शित, आमिर-ऊर्मिला-जॅकीची मुख्य भूमिका असलेला ‘रंगिला’ प्रदर्शित झाला आणि सुपर हिटही ठरला आहे. फार पूर्वी कित्येक कनिष्ठ मध्यमवर्गात घरच्या गणपतीला चित्रपटाच्या पोस्टरची सजावट केलेली असायची. चित्रपटांची ही पोस्टर्स त्यावेळी नळबाजार-भेंडीबाजारात खूपच स्वस्तात विकत मिळत असत. त्यामुळे गणपतीची सजावटही होई आणि घराचा उतरलेला रंग अथवा पडक्या भिंतीही रुपेरी पडद्यावरच्या या रंगात झाकल्या जात. पूर्वी श्रीगणेशोसत्व म्हणजे ‘गल्ली चित्रपटां’ची खूप मोठी चंगळ असे. जुन्या मराठी हिंदी चित्रपटांचा जणू महोत्सवच होता म्हणा ना. गणेशोत्सवात मुंबापुरी दंग असताना पडद्यामागच्या या आठवणींचा असा शिडकावाही उल्हसित करून जातो.