किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत.

‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले.
त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता.

त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही गुप्तता पाळली होती. त्यांनी सार्वजनिक जीवनातून घेतलेली माघार हा अखेपर्यंत गूढ राहिलेला विषय होता. रामकृष्ण मिशनच्या अनुयायी असलेल्या सुचित्रा सेन भारत महाराज यांच्या निधनानंतर कोलकाता येथील बेलूर मठात सार्वजनिकरीत्या उपस्थित होत्या. त्यांच्या कन्या मुनमुन सेन या बंगाली अभिनेत्री असून त्या त्यांच्या आईने ठेवलेला सौंदर्याचा व अभिनयाचा वारसा याच्या छायेतून बाहेर येऊ शकल्या नाहीत.  त्यांच्या नाती रिया व रायमा यांनी काही बॉलिवडू चित्रपट केले. ‘सात पाके बंधा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मॉस्को आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांना १९६३ मध्ये गौरवण्यात आले होते. १९५३-१९७५ या काळात त्यांनी उत्तमकुमार यांच्यासमवेत ३० चित्रपट केले होते. त्या वेळी त्यांचे सूत जुळल्याच्याही चर्चा होत्या. विष्णुप्रिया, रीना ब्राऊन व बिजया या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्यांना रोमँटिक अभिनेत्रीचा मान मिळाला. सेन यांचा जन्म १९३१ मध्ये आताच्या बांगलादेशात करुणमय व इंदिरा दासगुप्ता या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे नाव रमा दासगुप्ता असे होते. सुचित्रा सेन यांचा विवाह दिबानाथ सेन यांच्याशी १९४७ मध्ये झाला. त्यानंतर त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली, पण त्यांच्या यशाने त्यांच्या विवाहात अनेक अडथळे आले होते.

सुचित्रा सेन यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले.

सुचित्रा सेन कायम स्मरणात राहतील : अमिताभ बच्चन</strong>
‘बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन या त्यांचे सौंदर्य, बुद्धिमत्ता व गूढ व्यक्तिमत्त्वामुळे सदैव स्मरणात राहतील. त्यांनी बंगाली चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातही मोठी कामगिरी केली होती,’ अशा शब्दात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुचित्रा सेन यांना ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली.
बंगाली सुपरस्टार प्रोसनजित चॅटर्जी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सुचित्रा सेन यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय चित्रपटाची महानायिका आपल्याला सोडून गेली असे ते म्हणाले.
अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या की, सुचित्रा सेन या महिला सक्षमीकरणाच्या प्रतीक होत्या. त्या केवळ बंगाली चित्रपटातील अभिनेत्री होत्या असे नाही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान मिळवला होता. अभिनेत्री श्रीदेवीने ट्विटरवर म्हटले आहे की, त्या उत्तम दर्जाच्या अभिनेत्री होत्या, दैवी सौंदर्य त्यांना लाभले होते, जिवंतपणी त्या दंतकथा ठरल्या व नवीन पिढीला आदर्श ठरल्या.
शूजित सरकार यांनी म्हटले आहे की, त्या आमच्यासाठी प्रेरणा आहेत, चित्रपटसृष्टीच्या चमचमत्या दुनियेपासून वेळ येताच दूर राहण्याची क्षमता त्यांनी दाखवली.  मधुर भांडारकर यांनी सांगितले की, त्यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले. देवदास, आँधी व ममता या चित्रपटातील त्यांच्या भूमिका स्मरणात राहतील.
प्रेम चोप्रा यांनी म्हटले आहे की, त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. त्या महान अभिनेत्री होत्या व बंगाली चित्रपटातील आदर्श अभिनेत्री होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध केले.

अखेर ते गूढ उकललेच नाही..
चित्रपटसृष्टी सोडून गेली ३५ वर्षे सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलेल्या बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्या स्वभावातील गूढ अखेर कुणालाच उलगडता आले नाही. खरेतर बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीत चांगला नावलौकिक कमावल्यानंतर १९७८मध्ये अभिनेते सौमित्र चटर्जी यांच्यासमवेत केलेला प्रणॉय पाश हा चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्या सार्वजनिक जीवनातून दूर झाल्या. त्यानंतर त्यांनी केवळ लोकांपुढे यायला नको म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कारही नाकारला होता.
त्यांच्या मृत्यूतही गूढ होते. त्यांचा पार्थिव देह नेतानाही त्यावर पांढरी फुले वाहिली होती. काळ्या काचेच्या गाडीतून पार्थिव नेले जात असताना त्यांच्या चाहत्यांना त्यांची अखेरची दृष्टभेटही मिळू शकली नाही, अनेक वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे रुग्णालयाबाहेर होते पण त्यांना त्यांची अखेरची छबी टिपता आली नाही. त्यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार आम्ही असे केले. त्यांचा पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी दक्षिण कोलकाता येथील केवरतळा येथील स्मशानभूमीत आणला तेव्हाही तो शवपेटीत ठेवलेला होता नंतर तो लोकांच्या नजरा चुकवून चितेवर ठेवण्यात आला. गेल्या तीस वर्षांत सुचित्रा सेन यांचा चेहरा त्यांचे निकटवर्तीय वगळता कोणालाच दिसला नाही. त्या सार्वजनिक जीवनापासून दूर का गेल्या याचे कोडे कुणाला उलगडले नाही. २००७ मध्ये एका बंगाली वाहिनीने असा दावा केला होता की, आम्ही त्यांची छायाचित्रे टिपली आहेत पण व्यक्तिगतता राखण्यासाठी आम्ही ती दाखवणार नाही. अस्पष्ट अशी ही छायाचित्रे नंतर इंटरनेटवर आली होती पण ती ओळखूही येत नव्हती.
बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका अपर्णा सेन या सुचित्रा सेन यांचे सार्वजनिक जीवनापासून दूर जाण्याचे गूढ उकलण्यासाठी एक माहितीपट तयार करणार होत्या. त्या म्हणाल्या की, त्यांच्यावर माहितीपट तयार करण्याची आपली तयारी होती पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे  त्यांचे सार्वजनिक जीवनापासून दूर जाण्याचे गूढ हे गूढच राहिले.