जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटे बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप

“असा मृत्यू जगात कोणालाही येऊ नये. ही एक हृदयद्रावक घटना आहे.” अशा आशयाचे ट्विट रिचाने केले आहे. रिचाने बॉलिवूड दिग्दर्शक नीरज घेवाण याने केलेले ट्विट रिट्विट करुन ही प्रतिक्रिया दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या ट्विटमधील फोटो पाहून डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “…म्हणून मोदींनी देशाला ७० वर्षे मागे नेलं”; अभिनेत्याचा टोला

नेमकी घटना काय घडली होती?

जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला. तर पाच मजूर गंभीर जखमी झाले होते. जखमीपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येथे नेहण्यात आले आहे. रेल्वे रूग्णालयात जखमींवर उपाचार सुरू आहेत. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.