अभिनेता सलमान खान काश्मीरबाबत खूपच आशादायी आहे. इथल्या तरुणांना, लोकांना योग्य शिक्षण दिलं तर काश्मीरचा प्रश्न सुटू शकतो असा विश्वास सलमाननं व्यक्त केला आहे. सलमान खानची निर्मिती असलेला ‘नोटबुक’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सलमानला काश्मीरबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी सलमाननं आपलं मत मांडलं.

‘प्रत्येकाला शिक्षण मिळतं पण योग्य शिक्षण मिळणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं’, असं सलमान म्हणाला. १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दाखला देत त्यानं आपले विचार अधिक स्पष्ट करून सांगितले. दहशतवाद्यांना देखील शिक्षण मिळालं होतं, पण ते शिक्षण चुकीचं होतं, त्यांचा शिक्षक चुकीचा होता म्हणूनच बदल घडवायचा असेल तर योग्य शिक्षणही तितकंच गरजेचं आहे’, असं मत त्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे.

सलमानची निर्मीती असलेल्या ‘नोटबुक’ला काश्मीरची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात काश्मीरच्या खोऱ्यात फुलणारी प्रेमकथा त्यात दाखवण्यात आली आहे.