अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा दर दिवसागणिक पाहायला मिळत आहेत. बी- टाऊनमधील बहुचर्चित कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जात असून, त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही आता जोर धरला आहे. सध्याच्या घडीला हे दोघंही आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. असं असलं तरीही त्यांच्या नात्यालाही ते तितकच प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलियाच्या कुटुंबियांची एक बैठक होणार असून, त्याच भेटीत त्यांच्या लग्नाची बोलणी होणार असल्याचं म्हटलं जात होतं. या सेलिब्रिटी जोडीच्या प्रेमप्रकरणाविषयी ज्यावेळी सर्वांना माहिती मिळाली तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबियांनाही विविध कार्यक्रमात याविषयीचे प्रश्न विचारले जाऊ लागले.

अनेकदा आपल्या मुलांच्या नात्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतरही पुन्हा अशाच पद्धतीचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे ऋषी कपूर यांनी अखेर त्यांच्या शैलीत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘आपलं आयुष्य कसं जगावं हे ठरवण्याचा सर्वस्वी हक्क रणबीरलाच आहे. त्याने कोणाशी लग्न करावं हा निर्णयही त्याचाच आहे. नीतूला ती आवडते आणि मलाही ती आवडते. मीच काय पण माझ्या काकांनीही त्यांच्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न केलं. मग रणबीरच्या निर्णयावर मी का हरकत घ्यावी’ असा प्रश्न करत ऋषी कपूर यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.