रणबीरच्या ‘संजू’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभला. हा चित्रपट रणबीरचं करिअर खऱ्या अर्थानं तारणारा ठरला आहे. मात्र रणबीरचे वडील ऋषी कपूर यांना करिअरपेक्षाही रणबीरच्या लग्नाची अधिक घाई लागली आहे त्यामुळे लग्नाबाबत विचार कर, हीच योग्य वेळ आहे असा सल्ला ऋषी कपूर यांनी रणबीरला दिला आहे.

सध्या रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरनं आलियासोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती. इतकंच नाही तर हे दोघंही २०२० पर्यंत लग्नाच्या बेडीत अडकणार असंही म्हटलं जात होतं. त्यामुळे बॉलिवूडमधल्या या क्युट कपलनं लग्न करावं अशी इच्छा जशी चाहत्यांची आहे तशीच ती ऋषी कपूर यांचीदेखील आहे. म्हणूनच रणबीर आणि त्याचा मित्र आयान मुखर्जीचा फोटो ट्विट करत लग्न करण्यासाठी हिच योग्य वेळ आहे त्यामुळे लग्नाचा विचार लवकर करा असा सल्ला या दोघांनांही ऋषी कपूर यांनी दिला आहे.

रणबीर काही वर्षांपूर्वी दीपिका पादुकोनला डेट करत होता. रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दीपिकानं मानेवर त्याच्या नावाचा टॅटूदेखील गोंदवून घेतला होता. मात्र रणबीरच्या आयुष्यात कतरिना आली आणि दीपिका रणबीरची प्रेम कहाणी अपूर्णच राहिली. कतरिनासाठी कुटुंबियांशी भांडून रणबीर वेगळा राहत होता अशाही चर्चा होत्या. हे दोघंही विवाह बंधनात अडकतील असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र रणबीर- कतरिनाच्या प्रेमाचा डावही अर्ध्यावर मोडला. पण, आता मात्र रणबीरनं करिअरबरोबर आयुष्याचाही गांभीर्यानं विचार करुन लग्न करावं असं ऋषी कपूर यांना वाटत आहे म्हणूनच त्यांनी रणबीरला लवकरात लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.