ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी एका मुलारखतीमध्ये त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. पण आता त्यांची ही इच्छा रणबीर पूर्ण करु शकला नाही असे म्हटले जात आहे.

ऋषी कपूर हे रणबीरच्या लग्नाबाबत अतिशय उत्साही होते. त्यांना एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘त्या दोघांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. मला माझ्या मरणाआधी रणबीरचे लग्न पहायची इच्छा आहे’ असे त्यांनी म्हटले होते.

‘जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा मी २७ वर्षांचा होतो आणि रणबीर आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याने लग्नाचा विचार करायला हवा. रणबीर त्याला आवडत असलेल्या मुलीशी लग्न करु शकतो आणि माझा त्याला पाठिंबा असेल. जेव्हा कधी रणबीर लग्नासाठी तयार होईल मला आनंदच होईल. त्याच्या आनंदात माझा आनंद आहे. मला मरणाआधी माझ्या नातवंडांसोबत देखील वेळ घालवयचा आहे’ असे ऋषी कपूर यांनी शेवटी म्हटले होते.