प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर-प्रेयसीचं असो, आई-मुलाचं किंवा नवरा-बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ‘झी युवा’ प्रेक्षकांसमोर ‘गुलमोहर’ मालिकेतून आणत आहे. प्रेम, भावना आणि नातेसंबंध यावर आधारित विविध कथा सांगणाऱ्या या मालिकेत ब्रेकअपची नवीन कथा दाखवण्यात येणार आहे. एका प्रेमाच्या ब्रेकअपची गोष्ट सांगणारी ही ‘पत्र’ नावाची कथा आहे. या कथेद्वारे झी युवा एक नवी जोडी प्रेक्षकांसमोर आणते आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेली आणि आपल्या सर्वाची आवडती जोडी रमेश देव आणि सीमा देव या भागात असणार आहेत आणि त्यांच्याबरोबर नवीन जोडी आहे रोहन गुजर आणि आरती मोरे. रोहनला आपण ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘बन मस्का’ या मालिकांमधून आधी पाहिले आहे आणि आरती मोरे हिला ‘जय मल्हार’, ‘अस्मिता’ आणि ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकांमधून पाहिले आहे. या कथेमध्ये श्रेया म्हणजेच आरती मोरे आणि सुबोध म्हणजेच रोहन गुजर हे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करणारे आहेत, मात्र काही कारणांवरून त्यांचे ब्रेकअप होतं आणि श्रेया त्याच दु:खात घरी जाताना तिला रस्त्यात एक पाकीट सापडतं ज्यात फक्त १०० रुपये आणि एक अगदी जुना लिफाफा सापडतो. त्यात एक चिठ्ठीदेखील असते. ती चिठ्ठी जवळजवळ ५० वर्षांपूर्वी शालिनी म्हणजेच सीमा देव यांनी थत्ते आजोबा म्हणजेच रमेश देव यांना त्यांच्या ब्रेकअपविषयी लिहिलेली आहे. पन्नास वर्षांनंतरदेखील थत्ते आजोबांनी लग्न केले नसून ते आजही ते पत्र रोज वाचतात आणि शालिनीला आठवणींच्या रूपात स्वत:भोवती असल्याचा आनंद घेतात. ही गोष्ट जेव्हा श्रेयाला समजते तेव्हा तिलादेखील आपण कुठे तरी घाईने सुबोधबरोबर ब्रेकअपचा निर्णय घेतला नाही ना असं वाटायला लागतं. ती आणि सुबोध मिळून शालिनी आणि थत्ते आजोबांना एकत्र आणायचा निर्धार करतात. तो निर्धार यशस्वी होतो का हे ‘गुलमोहोर’च्या नव्या भागातून कळेल.