बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्याच्या घडीला ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखले जाते. बऱ्याच वर्षांपासून दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत असले तरीही आता मात्र त्यांच्या नात्याची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. इतकेच नव्हे तर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

‘पद्मावती’च्या ‘थ्री-डी’ट्रेलर लाँच सोहळ्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. मुख्य म्हणजे या सोहळ्यानंतर रणवीरने केलेल्या ट्विटमधून त्याच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याचा अंदाज अनेकांना लावता आला नाही. ‘आज दिवसाच्या सुरुवातीला पहिल्यांदाच एका मधमाशीने डंख मारला. त्याविषयीचे फोटो पोस्ट करायचा विचार होता. परंतु, नंतर मी ठरवलं मला त्या मधमाशीला उगाचच प्रसिद्ध करायचे नाही. हाहाहा’, असे त्याने ट्विट केले. या ट्विटनंतर त्याने आणखी एक उपरोधिक ट्विट केले. त्याच्या ट्विटमधील शब्द पुन्हा एकदा फॉलोअर्सपुढे कोडे निर्माण करुन गेली. पण, त्याच्या सुजाण चाहत्यांच्या आणि काही नेटकऱ्यांच्या मते मात्र रणवीरने हे ट्विट दीपिकाला उद्देशूनच केले आहे.

रणवीरने नेमके असे ट्विट का केले, याचा खुलासा सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत केला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’च्या ‘थ्री-डी ट्रेलर लाँच सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकांवर शाहिद कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या तिन्ही कलाकारांची नावे नव्हती. कलाकारांच्या टीमलाही याविषयी सांगण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला ‘पद्मावती’च्या स्टारकास्टचे जाणे अपेक्षित नव्हते. पण, दीपिकाने अगदी शेवटच्या क्षणी या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. तिने कार्यक्रमाला जाण्यापूर्वी रणवीर आणि शाहिदला याची काहीच कल्पनाही दिली नाही, ज्यामुळे तेही तिच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

दीपिका या कार्यक्रमाला येणार नसल्याचे कार्यक्रमाच्या ठिकाणीही सांगण्यात आले होते. पण, शेवटच्या क्षणी इतर सहकलाकारांशिवाय तिचे या ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचणे अनेकांसाठी अनपेक्षित होते. दीपिका या कार्यक्रमाला हजर होती त्यावेळी शाहिद आणि रणवीर मात्र कोणत्याच महत्त्वाच्या कामात कामात व्यग्र नव्हते. त्यामुळे जर तिने या दोन्ही कलाकारांना याविषयीची कल्पना दिली असती तर त्यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली असती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दीपिकाचे असे वागणे रणवीरला मुळीच पटले नसल्यामुळे शेवटी त्याने उपरोधिक ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. रणवीरच्या या ट्विटनंतरच दीपिका आणि त्याच्या नात्यात ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचे स्पष्ट झाले. त्या प्रसंगापासून या दोन्ही कलाकारांनी एकमेकांशी बोलणेही टाळल्याचे म्हटले जातेय.