अभिनेत्री स्मिता तांबेचे 18 जानेवारीला लग्न झाले. स्मिताच्या माहेरी दरवर्षी गौराईचे आगमन होते. यंदा तिच्या सासरी मुंबईमध्ये पहिल्यांदाच गौराई बसल्या आहेत. स्मिताने सुंदर वस्त्रालंकार परिधान करून मोठ्या थाटामाटाने गौराईचे स्वागत केले. भक्तिभावाने गौराईची पूजाअर्चा, पाहुणचार केला.

स्मिता तांबेच्या घरी सात दिवसांचे गौरी-गणपती येतात. गणपती बाप्पाची मूर्ती तिचे पती धिरेंद्र व्दिवेदी स्वत: हाताने साकारतात आणि स्मिता गणपतीचे वस्त्रालंकार सजवते. तसेच गौराईसाठीही साडी-चोळी हाताने बनवण्यापासूनते ते तिचा साजशृंगार करण्यापासून ते नैवेद्य बनवण्यापर्यंत सगळे स्मिता स्वत:च्या हाताने बनवते.

गौरी गणपती आणि स्मिता तांबेचे वेगळे नाते आहे. त्याविषयी स्मिता सांगते, “लहानपणापासून गौरी-गणपती आल्यावर माढ्यात आगळे चौतन्य निर्माण होते. हा सण मला प्रचंड आवडतो. मला लहानपणापासून गौरीचा शृंगार, तिचे दागिने, तिला टिकली लावायची, हातावर मेंदी लावायची आणि साड्या नेसवायच्या हे सगळं करायला खूप आवडायचं. आज लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या घरी गौरी आली आहे.”

आणखी वाचा :  बॉक्स ऑफीसवर ‘छिछोरे’ची बाजी

ती पुढे सांगते,“एरवी आईच्या हाताखाली गौरी गणपतीसाठी तिला मदत करायचे. यावेळेला पहिल्यांदा हे सगळं मी स्वतः केलं. गौरी-गणपती माझ्या घरी आल्यामुळे मी खूप भावूक झाले आहे. त्यांची पूजाअर्चा, सेवा करताना त्यांच्यात मन रमायला लागतं. मी त्यांच्याशी मनाने एकरूप होते.”

स्मिताने स्वत: गौरीसाठी खणाच्या नऊवारी साड्या तयार केल्या आहेत. ती म्हणते. “मी गौराईला खणाच्या नऊवाऱ्या नेसवल्या आहेत. कारण मला खणाचं कापड खूप आवडतं. त्यासाठी कोल्हापूरच्या महलक्ष्मी मंदिराच्या बाहेरून हे कापड खरेदी केलंय. त्या कापडाच्या या नऊवारी साड्या मी नेसवल्या आहेत.”