गेल्या काही दिवसापासून #MeToo या मोहिमेने चांगला जोर धरला आहे. आपल्यावरील लैंगिक अत्याचारावर स्त्रिया पुढे येऊन बोलत आहेत. प्रथम चित्रपटसृष्टीतील महिलांनी त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यानंतर  क्रीडा, राजकारण, अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांची नावे समोर येऊ लागली. यात आता प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनी एका माजी केंद्रीय मंत्र्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.

काही दिवसापूर्वीच सई परांजपे यांच्या ‘सय’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशनावेळी सई परांजपे यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी केंद्रीय मंत्र्यांवर आरोप केले आहेत. मात्र सई यांनी आरोप केलेल्या मंत्र्याचे नाव स्पष्ट केले नसून ते आता हयात नसल्याचंही सांगितलं.

‘मी टूचा अनुभव प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या वळणावर कुठे ना कुठेतरी येत असतो. मलादेखील असा अनुभव बऱ्याच वेळा आला. अनेकांनी माझ्याजवळ येण्याचा आणि माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. इतकचं नाही तर एका माजी केंद्रीय मंत्र्यानेदेखील माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक पत्र पाठवत माझ्याकडे एका रात्रीसाठी विचारणा केली होती, परंतु आता त्या घटनेला अनेक वर्ष उलटले असून ते मंत्री सध्या हयात नाहीयेत’, असा धक्कादायक अनुभव सई परांजपे यांनी यावेळी शेअर केला.

पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘लहानपणी देखील मला असाच एक अनुभव आला होता. पुण्यात असताना मी सायकलवरुव जात होते. तेव्हा एका रोडरोमिओने माझी भररस्त्यात छेड काढली होती. याप्रकरणी मला पोलीस ठाण्यात तक्रार करणार होते. परंतु काही जणांनी मला पोलिसात तक्रार दाखल न करण्याचा सल्ला देण्यात आला होता’.

दरम्यान,  बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्तानं एका अर्थानं या मोहिमेला सुरूवात केली. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दिग्दर्शक साजिद खान, आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, कैलास खेर, रजत कपूर यांसारख्या अनेकांवर गैरवर्तणुकीचे आरोप आहेत.