बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. सुशांतच्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड सृष्टीला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे सुशांतबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र या पोस्ट केवळ प्रसिद्धीसाठी केल्या जात असल्याचा आरोप अभिनेता सैफ अली खानने केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने सुशांतच्या आत्महत्येला दुर्दैवी घटना असं म्हटलं. तो म्हणाला, “सुशांतच्या आत्महत्येपेक्षा दुदैवी बाब म्हणजे काही मंडळींनी या घटनेचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. सुशांत नैराश्येमध्ये असताना त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही अन् आता प्रत्येक जण त्याच्यासाठी प्रेम व्यक्त करतायत. हे केवळ ढोंग आहे, बाकी काही नाही. ही मंडळी केवळ सुशांतचा अपमान करत आहेत.”

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.