बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अन्य कलाकार आरोपी असलेल्या १९ वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालय उद्या निकाल देणार आहे. सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत सिंह यांच्यावर दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. १९९८ साली राजस्थानच्या कानकानीमध्ये या कलाकारांनी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. निकालाच्या सुनावणीसाठी हे कलाकार जोधपूरमध्ये पोहोचले. दरम्यान, सैफ अली खान त्याच्या चालकाला दटावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काळवीट शिकार प्रकरणामुळे सर्व प्रसारमाध्यमांनी जोधपूर विमानतळाच्या परिसरात गर्दी केली होती. प्रसारमाध्यमं सैफला सातत्याने काळवीट हत्या प्रकरणाचे प्रश्न विचारत होते. या प्रश्नांना तो कोणतीही उत्तरं देत नव्हता. मात्र आजूबाजूचे कॅमेरे आणि तिथल्या वातावरणाने सैफ वैतागला होता. यात सैफने त्याच्या चालकाला फटकारत म्हटले की, ‘गाडीची काच वर कर नाही तर मारेन…’ सैफचे चालकासोबतचे संभाषण व्हिडिओमध्येही कैद झाले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाशी निगडीत सर्व कलाकारांनी या निकालाला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उद्या ५ एप्रिलला सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावर अंतिम सुनावणी आहे. या प्रकरणात सलमानला तुरुंगवास होणार की त्याची निर्दोष सुटका होणार हे तर उद्याच कळेल.

काय आहे प्रकरण-

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत काळवीटाची शिकार करणे प्रतिबंधित आहे. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणात सलमानला थोडासा दिलासा मिळाला आहे. शस्त्रास्त्र कायद्याखाली सत्र न्यायालयाने त्याची सुटका केली. त्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. चिंकारा शिकार प्रकरणातही सलमानवर आरोप होते. चिंकाराचाही संरक्षित प्रजातींमध्ये समावेश होतो. चिंकारा शिकारीत त्याची निर्दोष सुटका झाली. राजस्थान उच्च न्यायालयानेही त्याच्या सुटकेचा निर्णय कायम ठेवला. राजस्थान सरकारने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तिथे हे प्रकरण प्रलंबित आहे.