२००३ साली आलेल्या ‘एलओसी : कारगिल’ चित्रपटात शेवटचा दिसलेला अरमान कोहली बऱ्याच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी ‘बिग बॉ़स’मध्ये सहभागी झालेल्या अरमानच्या चित्रपटातील अभिनयाच्या कारकिर्दीने अचानक उभारी घेतली आहे. ‘बिग बॉस’नंतर सलमान खानचा अभिनय असलेल्या सुरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात त्याला खलनायकाची भूमिका मिळाली आहे. आता त्याला साजिद नाडियादवाला यांच्या दोन चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचे समजते. या गोष्टीला अरमानने दुजोरा दिला आहे. नाडियादवाला पाच चित्रपट सुरू करण्याच्या बेतात असून, त्यातल्या दोन चित्रपटात काम करण्यासाठी नाडियादवाला यांनी आपल्याला ऑफिसमध्ये बोलवून विनंती केल्याचे अरमान म्हणाला. अरमानकडे सध्या बऱ्यापैकी चित्रपट चालून येत असले, तरी त्याने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.