सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जितेंद्र जोशी कलाकारांच्या आयुष्यातील गुपिते सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. अभिनयाच्या पलिकडील त्यांचे आयुष्य, त्यांची मते तसेच आठवणी गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न जितेंद्र करताना दिसतो. नुकताच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अभिनेत्री शुभांगी गोखले आणि चिन्मयी राघवन यांनी हजेरी लावली. दरम्यान शुभांगी या पतीच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शुभांगी यांनी त्यांचे दिवंगत पती लोकप्रिय सिने आणि नाट्य कलाकार मोहन गोखले यांच्या आठवणींना उजाळा दिला. मोहन गोखले यांच्या मृत्यूपूर्वीच्या आठवणी सांगताना शुभांगी यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी मृत्यूपूर्वी घराच्या दरावर कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी लिहून लावल्याचा किस्सा सांगितला. त्याचप्रमाणे मोहन गोखले हे एक ग्लोबल अभिनेते होते परंतु आजवर त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली गेली नाही असे म्हणत शुभांगी यांनी निराशा व्यक्त केली. 'श्वेतांबरा' या मालिकेतून मोहन यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'मिस्टर योगी' मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी 'हिरो हिरालाल',' मोहन जोशी हाजीर हो' या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भुमिका केल्या. त्यावेळी मोहन गोखले प्रसिद्धीच्या झोतात होते. मात्र, वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत 'हे राम'च्या चित्रीकरणासाठी गेलेले मोहन २९ एप्रिल १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले आणि चित्रपटसृष्टीने एक उत्कृष्ट अभिनेता गमावला.