बिग बॉसच्या १० व्या सिझनचा विजेता मनवीर गुर्जर बिग बॉस हाऊसमधून बाहेर पडल्यापासून वादात सापडला आहे. त्याच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तो बिग बॉसच्या घरात अविवाहित म्हणून का मिरवला हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावता असल्याचे दिसते. मनवीरच्या व्हायरल झालेल्या लग्नाच्या व्हिडिओत तो शिवीगाळ करतानाही दिसले होते. सामान्य घरातून लोकप्रिय कार्यक्रमात वर्णी लागल्यानंतर मनवीरवर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र सध्याच्या घडीला त्याच्या विवाहाची चर्चा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्याच्या लग्नासंदर्भात दिवसेंदिवस नवीन वळण मिळत असल्याचे दिसते. सध्या बॉलिवूड वर्तुळामध्ये रंगणाऱ्या चर्चेनुसार, मनवीर विवाहित असल्याची पूर्व कल्पना बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानला देखील होती. मात्र तरीही बिग बॉसच्या घरात मनवीर गुर्जर अविवाहित म्हणून वावरताना दिसला होता. सलमानसह आयोजकांनाही मनवीर विवाहित असल्याचे माहित होते.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलिवूडचा सुलतान सलमान खानला मनवीरच्या विवाहासंदर्भात विचारण्यात आले होते. मात्र यावेळी सलमानने मौन बाळगल्याचे दिसले. विशेष म्हणजे मनवीर विवाहित आहे, यावर सलमानच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसले नाहीत. यावरुन सलमानला तो विवाहित असल्याची पूर्वीपासूनच कल्पना होती असाही अंदाज लावण्यात येत असल्याचे दिसते. मनवीरच्या लग्नावर त्याच्या कुटुंबियातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचे दिसते. मनवीर अद्याप अविवाहित असल्याच्या मुद्यावर त्याची आई ठाम आहे. मनवीरच्या लग्नाची बातमी खोटी असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. एवढेच नाही तर मनवीरचे ज्यावेळी लग्न होईल तेव्हा ते मोठ्या थाटामाटात होईल, असेही त्यांनी सांगितले.

खुद्द मनवीरला ज्यावेळी यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी मनवीरने लग्नासंदर्भाच्या वृत्तावर थेट बोलणे टाळल्याचे दिसून आले. बिग बॉसच्या घरात लग्नासंदर्भात मला विचारणाच करण्यात आली नव्हती असे तो म्हणाला. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, मनवीरचे फक्त लग्नच झालेल नाही तर त्याला एक ५ वर्षाची मुलगी देखील आहे. प्रसारमाध्यमात रंगणाऱ्या चर्चेला मनवीरच्या काकांनी दुजोरा दिला होता. मनवीरचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला असून त्याला दीड वर्षाची मुलगी असल्याचे त्यांनी म्हटले होते. ही गोष्ट बिग बॉसच्या आयोजकांना देखील माहित होती, असे ते म्हणाले होते. मनवीर विवाहित असल्याचे कळल्यास तरुणींमधील त्याची लोकप्रियता कमी होऊ नये, यासाठीच त्याच्या विवाहासंदर्भात गोपनियाता पाळल्याचा सूर उमटताना दिसतो. मनवीरच्या लग्नाबद्दल अद्याप नक्की सत्य काय आहे हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.