बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत ठरलेला ‘भारत’ हा चित्रपट बुधवारी (५ जून) ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्यांचा भरणा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला असून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

सलमानच्या चाहत्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला असून त्यांनी प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आव्हान केलं आहे. काही चाहत्यांनी तर चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर जल्लोष साजरा केला. इतकंच नाही तर काहींनी नवीन मीम्स तयार करुन सलमानला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.  चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील या चित्रपटाला चार स्टार दिले आहे. त्यामुळे सलमानसाठी यंदाची ईददेखील खास ठरली आहे.

दरम्यान, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमानने तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत अनेक रुपे साकारली आहेत. या चित्रपटात भारतच्या(सलमान खान) आयुष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सलमान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.