करण जोहरचा ‘शुद्धी’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात होण्याआधीपासूनच त्यात अनेक अडथळे येत आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन आणि करिना कपूर-खान ही प्रमुख जोडी काम करणार होती. परंतु, चित्रपटाचे काम सुरू होण्यास होत असलेल्या सततच्या दिरंगाईने करिना कपूर या चित्रपटातून बाहेर पडली. तिच्यापाठोपाठ चित्रपटातील प्रमुख अभिनेता हृतिक रोशनदेखील तारखांच्या कारणामुळे चित्रपटातून बाहेर पडला. त्यामुळे या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची वर्णी लागल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढंच नाही तर या दोघांनी ‘शुद्धी’करता चक्क संजय लीला भन्सालीचा ‘बाजीराव मस्तानी’देखील नाकारल्याची चर्चा सुरु होती. पण, या दोघांनाहीदेखील तारखांच्या घोळामुळे ‘शुद्धी’ऐवजी ‘बाजीराव मस्तानी’मध्ये काम करण्याचे ठरवले आहे. हृतिक, रणवीर या दोघांनीही चित्रपट नाकारल्यानंतर बॉलीवूडचा दबंग खान सलमानने करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात काम करण्यास होकार कळवल्याचे कळते. मात्र, चित्रपटातील हिरोईनसाठी अद्याप कोणाचेही नाव ठरविण्यात आलेले नाही.
‘शुद्दी’ हा चित्रपट निर्माता करण जोहरसाठी अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे. अमिष त्रिपाठी यांच्या ‘इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहाज’ या  गाजलेल्या कादंबरीवर ‘शुद्दी’ चित्रपटाची कथा आधारित आहे.