अभिनेता सलमान खान आणि वाद हे आता एक समीकरणच झाले आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सलमान खान चर्चेत असतो. आता सलमान खान कोणत्या प्रकरणात अडकला असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ‘भारत’ या नव्याने येणाऱ्या त्याच्या चित्रपटामुळे तो चर्चेत आला आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरिनाला पाकिस्तानचा झेंडा फडकवायचा होता. त्याने हा सीन यशस्वीरित्या केलाही. मात्र याठिकाणच्या लोकांना हे पाहून चांगलाच धक्का बसला. भारतभूमीमध्ये अशाप्रकारे पाकिस्तानचा झेंडा कोणी कसा फडकावू शकतो असा प्रश्न येथील स्थानिकांनी उपस्थित केला.

या घटनेनंतर स्थानिकांनी सलमान खान आणि भारत चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली. इतकेच नाही तर या लोकांनी सलमान खान राहत असलेल्या ठिकाणालाही घेरले. सलमानने अशाप्रकारे पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यामागे दुसरे कोणतेच कारण नव्हते. तर हा चित्रपटाच्या चित्रिकरणाचा भाग होता असे निर्मात्यांनी या लोकांना बऱ्याचदा समजावले. मात्र या लोकांना निर्मात्यांचे म्हणणे एकून घेण्यात काडीचाही रस नव्हता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. इतकेच नाही तर सलमानवरील संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी निर्मात्यांनी वाघा बॉर्डरसारखाच दिसणारा सेट पंजाबमध्ये तयार केला आहे. मूळ वाघा बॉर्डरवर शूटींग करण्यास मनाई केल्याने निर्मात्यांना हे करावे लागले.

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. प्रियांका चोप्रानं काही दिवसांपूर्वीच ‘भारत’ला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, कतरिना कैफ, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. २०१९ मध्ये ईदच्या दिवशी भारत प्रदर्शित होणार आहे.