बॉलिवूडमध्ये जर का कोणत्या अभिनेत्याच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा रंगत असेल तर तो अभिनेता म्हणजे भाईजान अर्थात सलमान खान. अगदी चाहत्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाने एकदा तरी सलमानला त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावरुन छेडलं आहे. विशेष म्हणजे सलमानने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र आजही अनेक तरुणी त्याच्या प्रेमात आहेत. इतकंच नाही तर कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींची नावदेखील त्याच्यासोबत जोडली गेली आहेत. परंतु त्यांचं हे नात कधीही लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्यातच आता पुन्हा एकदा एका अभिनेत्री त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सलमानने आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांना बॉलिवूडची ओळख करुन दिली. त्याच्यामुळे आज कलाविश्वामध्ये अनेक कलाकार नावारुपाला आले. त्यातीलच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री झरीन खान. ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या झरीन खान आणि सलमान यांचं खास कनेक्शन असून अगदी अभिनयापासून ते फिटनेस ट्रेनिंग घेण्यापर्यंत भाईजानने झरीनला विशेष मदत केली. त्यामुळेच अनेक वेळा त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र कालांतराने त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र आता झरीनने पुन्हा एकदा सलमानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये झरीनला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांची उत्तर देत तिने ही इच्छा व्यक्त केली. ‘तुझ्या अफेअरची जर चर्चा रंगली तर ती काय असेल?’ असा प्रश्न झरीनला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “जर माझ्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या तर माझं नाव सलमान खानसोबत जोडलं जावं. ही एक गंमतीशीर अफवा आहे जी मला स्वतःबद्दल ऐकायची आहे आणि ती अफवा अशी असेल की, सलमान माझ्याशी लग्न करणार आहे.”

दरम्यान, कतरिनासोबत सलमानचं ब्रेकअप झाल्यानंतर तो झरीनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होता. मात्र नंतर या दोघांमध्ये असं कोणतही नातं नसल्याचं समोर आलं. प्रोफशनल लाइफमध्ये सलमाननं तिला खूप मदत केली. तिनं सलमानसोबत ‘वीर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.