काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला आज जोधपूर न्यायालयाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सलमानला दोषी ठरवत असतानाच न्यायालयाने नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू यांना मात्र या प्रकरणातीन निर्दोष मुक्त केले आहे. सलमानला शिक्षा झाल्याबद्दल त्याच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानेही या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खान मुस्लिम असल्यानेच त्यााला शिक्षा सुनावण्यात आल्याचा अलौकीक तर्क लढवला आहे. 'सलमान हा मुस्लिम असल्याने त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमानच्या शिक्षेसारख्या घटना मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन वर्गाची भारतातील असणारी स्थिती दर्शवितात,' असे मत आसिफ यांनी एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. सध्या भारतात ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाला सलमान मानत नसल्याने त्याला दोषी सिद्ध करण्यात आले असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हे प्रकरण राजकीय आणि धार्मिक रंग घेणार अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता. त्याचीच आज अंतिम सुनावणी करण्यात आली. ५ वर्षांच्या कोठडीबरोबरच त्याला १० हजारांचा दंड सुनावला आहे. न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावताच जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. बिष्णोई समाजाकडून ही घोषणाबाजी करण्यात आली.