उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानादरम्यान तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. असे असतानाच पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्याबाबतीत मनसेच्या ‘अल्टीमेटम’बाबत बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर अभिनेता सलमान खानने नुकतेच ‘सर्जिकल स्ट्राईक’चे समर्थन करत सदर घटनेबद्दल आपले मत मांडले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणाऱ्या सलमानला प्रसारमाध्यमांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी त्याचे मत विचारले असला ‘सर्जिकल स्ट्राईक’चा भारताने घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यानंतर सलमानने पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवरही आपले मत मांडले. ‘पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, ते कलाकार आहेत. ते कलाकार अधिकृतपणे भारतात येतात. येथे काम करण्यासाठी लागणारा व्हिसा हा आपल्या सरकारकडूनच त्यांना दिला जातो. दहशतवादी आणि कलाकार यांच्यात फरक आहे. आपण दहशतवाद्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिले आहे’, असे म्हणत सलमानने त्याची भूमिका स्पष्ट केली. काही दिवसांपूर्वी सलमानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याच्या आणि त्यांची भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या बातमीचे एका पत्रकार परिषदेत खंडन केले. मात्र सलमानने पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेत अनेकांचा रोष ओढावला आहे असेच म्हणावे लागेल.

दरम्यान, पाकिस्तान कलाकारांसाठी भारतीय चित्रपट सृष्टीचे दरवाजे बंद झाले आहेत. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशनने (इम्पा)ने आपल्या ७७ व्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तान कलाकारांना काम न देण्याचा निर्णय घेतला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढला होता. राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासांत भारत सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यांनी ४८ तासांत देश सोडला नाही तर मनसे आपल्या स्टाईलने त्यांना पळवून लावेल अशी धमकीही मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी दिली होती.