गायीका रानू मंडल कधीकाळी रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या. परंतु व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. त्यांना हिमेश रेशमिया सारख्या प्रख्यात कलाकाराबरोबर गाण्याची संधी मिळाली. चहु बाजूंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान बॉलिवुडचा भाईजान सलमान खान याने रानू मंडल यांना घर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन त्याने पूर्ण केले नाही, अशा बातम्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होत्या. या संपूर्ण प्रकरणावर सलमान खान याने पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.

रानू मंडल यांनी गायलेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ माजवला होता. दरम्यान गरजूंचा तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानने रानू मंडल यांना तब्बल ५५ लाखांचे घर देऊ केल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु या अफवांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. “घर देण्याचे आश्वासन मी राणू मंडल यांना दिले नव्हते” अशी कबूली स्वत: सलमानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली.

काय म्हणाला सलमान?

“मी रानू मंडल यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही. माझ्या स्वतःच्याच घराची समस्या आहे. मी स्वतः एका बेडरुमच्या घरात राहत आहे. मी तिला कोणतही घर किंवा कार दिलेली नाही. कोण म्हणतं मी गाडी दिली, कोण म्हणतं घर दिलं, कुणीतरी मला बर्बाद करण्याचा विचार करत आहे.” अशा शब्दात सलमानने राणू मंडल यांना घर दिल्याच्या अफवांवर प्रतिक्रीया दिली.