सलमान म्हणतो..

लग्नाचे लाडू खाल्ले तरी आणि नाही खाल्ले तरी पश्चात्ताप होतो’ असे म्हटले जाते. बॉलीवूड ‘खान’दानातील सलमानच्या बाबतीत तसे घडले आहे. सलमानला अनेक जणींचे ‘प्रेम’मिळाले पण त्याचे ‘लग्न’काही होऊ शकले नाही. अर्थात सलमानला त्याबाबत खंत किंवा पश्चात्ताप वाटत नाही, उलट आता लग्न हे आयुष्यभरासाठी होत नाही तर तात्पुरते असते’ असे त्याने नुकतेच सांगितले होते. त्यामुळे सलमान लग्न करण्यासाठी आता उत्सुक नसल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. बॉलीवूडमध्ये सलमान खानच्या लग्नाची आणि प्रेम प्रकरणांची चर्चा नेहमीच होत असते. सलमानच्या आयुष्यात अनेक मैत्रिणी आल्या, त्याचे प्रेम जमले, पण हे नाते लग्नसंस्थेत परिवर्तित झाले नाही.

सलमानने आत्तापर्यंत लग्न केले नसले तरी त्याची प्रेम प्रकरणे खूप झाली आहेत. बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, लूलिया वंतूर अशा अनेक जणींशी सलमानचे नाव जोडले गेले होते. इतक्या जणींशी नाव जोडले गेलेला सलमान हा बॉलीवूडमधील गेल्या काही वर्षांतील एकमात्र अभिनेता असावा. यातील काही जणींबरोबर त्याचे लग्न होणार, अशी अटकळ बॉलीवूडमध्ये बांधली जात होती. मात्र लग्नाच्या गाठी मारल्या गेल्या नाहीत.

प्रसार माध्यमांशी बोलताना सलमानने नेहमीच त्याच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नाला नेहमीच उडवून लावले होते. पण ‘बिग बॉस-९’च्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना, मी कोणाशी आणि किती दिवसांसाठी लग्न करू, असा सवाल सलमानने उपस्थित केला. आता लग्न हे आयुष्यभरासाठी नसते. काळ बदलला असून लग्न तात्पुरते असते, असे सलमानने सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सलमान, त्याची प्रेम प्रकरणे आणि लग्नाची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू झाली आहे.