जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख उत्तर दिलं आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे.

दरम्यान भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. राजकीय नेत्यांसहित बॉलिवूड मंडळींनीही ट्विट करत भारतीय हवाई दलाचं कौतुक केलं आहे. यामध्ये अजय देवगण, अमिताभ बच्चन अक्षय कुमार आणि विवेक ओबेरॉय यांचा समावेश आहे. अभिनेता सलमान खाननेही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाला सलाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्याला भारतीय हवाई दलाचा अभिमान असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. आतमध्ये घुसून मारा, आता अजिबात शांत बसायचं नाही असंही अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.