सलमानने सध्या नवनवीन विधाने करून चाहत्यांना धक्के देण्याचे तंत्र अवलंबलेले दिसते आहे. आपल्या तथाकथित ‘व्हर्जिनिटी’वरून त्याने पहिला बॉम्ब टाकला. त्यानंतर, आपण आजवर कोणाचे चुंबन घेतलेले नाही, असेही तो म्हणाला. पण, हे सगळे त्याने गमती-गमतीत म्हटले असेल असे मानायला जावे तर त्याने नव्या वर्षांत पुन्हा नवा धक्का दिला आहे. आत्तापर्यंत कधीही लग्नाचा विषय काढल्यावर वैतागणाऱ्या सलमानने थंडपणे चक्क आपल्याला लग्न करण्यात रसच नसल्याचे जाहीर केले आहे.
जेव्हा जेव्हा सलमानला लग्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने हा आपला वैयक्तिक प्रश्न असल्याचे सांगून हल्ला परतून लावला होता. मग अजूनतरी आपल्या आयुष्यात कोणी नाही पण, आपल्यालाही लग्न करून स्थिरस्थावर व्हायचे आहे, असेही सांगून टाकले होते. मात्र, ‘जय हो’च्या प्रसिध्दीच्या निमित्ताने पुढे आलेल्या सलमानने आपल्याला आता लग्न करण्यात रस नसल्याचे सांगून टाकले आहे. ‘आत्तापर्यंत मी एकटाच होतो आणि आता हा एकटेपणा मला आवडू लागला आहे. कारण मी कोणालाही बांधील नाही. माझ्या आयुष्यात ज्याला यायचे असेल त्याने यावे. पण त्याने माझ्याकडून कुठलीच अपेक्षा करता कामा नये, असेही त्याने म्हटले आहे. मी एकदा शब्द दिला की काहीही झाले तरी तो मी शेवटपर्यंत पाळतो. पण, सध्या मला अशा कुठल्याच जबाबदारीत अडकायचे नाही. मी आता खूप सुखी आहे. मी कुठे गेलो होतो, मला कोणाकडे जायचे आहे?, अशा कुठल्याच प्रश्नांना मला उत्तरे द्यावी लागत नाहीत. आता ते माझ्यासाठी फार सोयीचे झाले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे बांधून घेऊन जगणे आता आपल्याला पसंत नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
लग्नाबरोबरच तिकीटबारीवरचे विक्रम मोडण्यातही आपल्याला रस नाही, अशी आणखी एक गुगली त्याने टाकली आहे. प्रत्यक्षात, गेल्यावर्षी एकही चित्रपट प्रदर्शित न झाल्याने या वर्षांच्या पहिल्याच महिन्यात ‘जय हो’  प्रदर्शित करण्याचा आटापिटा त्याने केला आहे.  ‘सध्या मिळणाऱ्या अव्वाच्या सव्वा कोटी पैशांनी चित्रपटसृष्टीतील लोकांना वेड लावले आहे. त्यामुळे, माझ्याही चित्रपटांनी चांगली कमाई करावी. निर्माते, वितरक आणि प्रदर्शकांना चांगली रक्कम माझ्या चित्रपटापासून मिळावी, एवढीच इच्छा आहे. पण, कोणत्याही चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडण्यात मला रस नाही’, असे सलमानने सांगितले.